निष्क्रिय बँक खात्यातील 216 कोटींच्या डाटा चोरीचा भंडाफोड – भाग्यश्री नवटके पुणे सायबर सेल

पुणे (वृत्तसंस्था) दिः16- राज्यासह संपूर्ण भारतातील विविध बँकांमधील निष्क्रिय असलेली खाती (DORMAT ACCOUNTS) आणि काही सद्यस्थितीतील ग्राहकांच्या असुरक्षित बँक खात्यांची इत्यंभूत माहिती चोरून तब्बल 216 कोटी 29 लाखांचा डाटा विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या सायबर भामट्यांच्या टोळीला पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केलेली आहे. त्यामध्ये चार उच्चशिक्षीत आयटी अभियंत्यांसह काही महिलांचा समावेश आहे. अशी माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपाआयुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिलेली आहे. या कारवाईने देशातील बँकिंग क्षेत्रातही प्रचंड खळबळ उडालेली आहे.
या प्रकरणी आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय 34, मुंबई), मुकेश हरिश्चंद्र मोरे (वय 37, येरवडा), राजशेखर यदैहा ममीडा (वय 34, हैदराबाद ), रोहन रवींद्र मंकणी (वय 37, सहकारनगर), विशाल धनंजय बेंद्रे (वय 45, वाशीम), रविंद्र महादेव माशाळकर (वय 34,अंबाजोगाई रोड, लातूर),सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (वय 54, सिंहगड रोड), राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42, संभाजीनगर), परमजित सिंग संधू (42, संभाजीनगर) अनघा अनिल मोडक (वय 40, वडगाव बुद्रुक) या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिलेली आहे.
आरोपींनी संगनमत करून काही नामांकित बँकांमधील निष्क्रिय खाते (DORMAT ACCOUNT ) आणि काही अॅक्टिव्ह बँक खात्यांची माहिती अनधिकृतपणे मिळविलेली होती. या सर्व बँक खात्यांमध्ये तब्बल 216 कोटी 29 लाख रुपये एवढी रक्कम होती. ही संपूर्ण माहिती चोरल्यानंतर आरोपी ते एका भामट्याला विक्री करणार होते, पण त्याची गुप्त माहिती सायबर सेलला मिळालेली होती. त्यामाहितीच्या आधारे सापळा रचून सायबर पोलीस आठ दिवसापासून टोळीच्या मागावर होते. त्यानुसार पथकाने त्यांना काल सिंहगड रोड परिसरातून छापा टाकत या सर्व आरौपींना ताब्यात घेतलेले आहे. त्यांच्याकडून 11 मोबाईल फोन, रोख 25 लाख, दोन कार, दुचाकी असा 43 लाख 54 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या पथकाने केलेली आहे.
सायबर हल्ला उधळला,आणि घोटाळा टळला
पुणे सायबर सेलच्या विशेष पथकाने हा संभाव्य सायबर हल्ला उधळून लावल्याने तब्बल 216 कोटींचा घोटाळा टळलेला आहे. या सर्व आरोपींना आयटी क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव असून ते पुण्यात वेगवेगळ्या दिग्गज आयटी कंपन्यांमध्ये नोकरीला आहेत. त्यांनी विविध अनधिकृत मार्गाने टवेगवेगळ्या बँकांची निष्क्रिय खाती आणि काही सुरू असलेल्या खात्यांची माहिती युजरआयडी आणि पासवर्डसह चोरलेली होती. आरोपी या सर्व चालू व निष्क्रिय खात्यांतील रक्कमा इतर बँक खात्यावर वळवून फसवणूक करणार होते. त्यानुसार 25 लाख रूपयांचा व्यवहार देखील एका व्यक्तीसोबत झालेला होता. या संभाव्य घोटाळ्याच्या प्रकरणाचा भंडाफोड सायबर पोलिसांनी केल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.