मोठ्या थकबाकीदार ग्राहकांचे वीजबील कनेक्शन सोमवारपासून तुटण्याची शक्यता?

अहमदनगर : जिल्ह्यातील श्रींगोदा येथे आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांनी वीजबिल वसुलीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता वीजबिल वसुलीबाब “जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही. मात्र आम्ही पन्नास टक्के शेतकऱ्यांना वीज पंपांकरीता सवलत दिलेली आहे. त्यामध्ये हजारो कोटी रुपये महावितरण कंपनी सहन करणार आहे.शेवटी कंपनी चालविण्याकरता निधी खूप लागतो. तरी देखील काही हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकरीता माफ केलेले आहेत” असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी श्रीगोंदा येथे पत्रकारांशी बोलताना केलेलं आहे.
राजू शेट्टींचा सरकारला इशारा
ग्राहकांकडून वीजबिल सक्त वसुल करण्याच्या धोरणावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज राज्य सरकारला इशारा दिला आहे. “लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्याऐवजी जर सक्तीने वीज कनेक्शन तोडणार असाल तर आम्ही सुद्धा दोन हात केल्याशिवाय राहणार नाही. वीज कनेक्शन कट करुन दाखवाच जनतेतून काय प्रतिक्रिया उमटतील ते तुम्हाला कळेलच”, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिलेला आहे.
“लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचं घरगुती वीजबिल माफ करावं, अशी भूमिका घेऊन जून महिन्यापासून आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. शहरी असो किंवा ग्रामीण असो, महाराष्ट्रीतील 1 कोटी 35 लाख कुटुंबांना लाभ मिळू शकतो. ही माफी घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, ही आमची भूमिका आहे. या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत आमची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील काल आम्ही भेटलो. आम्ही सर्वांना निर्वाणीचा इशारा दिला आहे”,असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलेले आहे.
वीज नियामक आयोगाच्या कलम 54 अन्वये वीजबीले माफ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आपली शक्ती व अधिकार वापरण्याची मागणी जनतेतून केली जात आहे. परंतु सरकार यावर गांभीर्याने विचार करताना दिसत नाही.
100 युनिट पर्यंतचे वीजबील माफ होणार असे वक्तव्य ऊर्जा मंत्री यांनी काही दिवसांपूर्वी केले होते पण तसे देखील होण्याची शक्यता कमी
60 हजार कोटींच्या वीज बिलाच्या थकबाकीमुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जाणाऱ्या महावितरण कंपनीने राज्यातील 71 लाख 68 हजार 596 ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्यासाठी नोटीस पाठविली आहे.आज शनिवारी वीज बिल भरले नाही तर सोमवारपासून वीज कनेक्शन तोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आधीच लाॕकडाऊनमुळे प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेल्या सामान्य जनतेला वाढीव वीजबीलांचा शाॕक बसलेला असल्याने जनतेत महावितरणच्या विरोधात प्रचंड असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे.