वऱ्हाडींच्या ट्रकला भीषण अपघात,चार ठार २२ जखमी

औरंगाबादः जिल्ह्यातील वैजापूर जवळ दोन आयशर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार तर २२ जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडलेली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या मृतांमध्ये 2 लहान बालकांचा समावेश आहे. अपघातातील जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. यापैकी एक वऱ्हाडींनी भरलेला ट्रक लग्न समारंभावरून परतत होता. त्यामुळे त्यात अनेक प्रवासी होते याच ट्रकमधील तिघे जण ठार झाले असून यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.
या अपघाताविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर जवळील शिवराई फाट्यावर पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.दोन आयशर ट्रकमध्ये हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे गतीवर अचानक नियंत्रण मिळवणे अशक्य झाले आणि चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या मुळे दोन्ही ट्रक परस्परांवर धडकले.
दरम्यान, शिवराई फाट्यावर झालेल्या या भीषण अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार कळवण्यात आला. परिसरातील नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातातील उर्वरीत २२ जखमींवर आता पुढील उपचार सुरु आहे.