
कुल्लूः हिमाचल प्रदेशयेथील कुल्लूजवळ भीषण अपघाताची घटना घडलेली आहे. कुल्लू येथील सैंज खोऱ्यात सोमवारी पहाटे एक खाजगी बस खोल दरीत कोसळल्याने किमान १६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आलेली आहे. या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते.
शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
या अपघातातील १६ मृतांमध्ये बहुतांश शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. सैंज घाटीतून शैंशर शहराकडे ही बस येत होती. याच दरम्यान जंगला नावाच्या एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सटले आणि बस थेट दरीत कोसळली. ही खासगी बस होती. या बसमध्ये काही स्थानिक प्रवाशांसह शाळेतील विद्यार्थी होते ते सैंज येथे शाळेत जात होते. कुल्लूचे एसपी गुरुदेव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसच्या अपघाताविषयी कळताच पोलिसांचे दोन पथकं तातडीने रवाना केले आहेत.
कुल्लूचे पोलिस उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी सांगितले की, सैंजला जाणारी बस जंगला गावाजवळ दरीत कोसळली. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. बसमध्ये जवळपास 45 प्रवासी होते. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघाताचे ठिकाण जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 60 किमी अंतरावर आहे. बचावकार्य सुरू असून आतापर्यंत तीन जखमींना वाचवण्यात यश आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताला “हृदय पिळवटून टाकणारे” म्हटले आणि शोकसंतप्त कुटुंबियांना शोक व्यक्त केला. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली.
या भीषण अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे की,हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दु:खद प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. मला आशा आहे की जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे,” पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरद्वारे ही माहिती दिलेली आहे.