
जळगाव: उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि जळगाव जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दिवसभरात दमदार पाऊस झाल्याने आज दिनांक 7 जुलै रोजी सकाळी 6 वाजेला हतनूर धरणाचे 30 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आलेले असून यावर्षी 30 दरवाजे पहिल्यांदाच उघडण्यात आलेले आहे.त्यातून 39200 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापीनदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी दुथळी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
दरम्यान, तापी नदीकाठी कोणीही कोणत्याही कामासाठी जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे. तसेच आज धरणाची जलपातळी 209.520 मीटर पर्यंत पोहचलेली असून धरणात आज रोजी 180.40 दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक आहे.आज मात्र पाटचारीत कोणताही विसर्ग सोडण्यात आलेला नाही. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने या क्षेत्रातील भुसावळ, मुक्ताईनगर , बोदवड, यावल , रावेर , या तालुक्यातील 38 हजार हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे उप अभियंता यांनी दिलेली आहे.