
जळगाव: संपूर्ण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरवात झालेली असून अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनातर्फे रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहिर करण्यात आलेला आहे.उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि जळगाव जिल्ह्यासाठी सिंचन व बिगर सिंचनाच्या क्षेत्रातील महत्त्वाच्या अशा हतनूर धरणाच्या मध्यप्रदेशातील तापी नदी व विदर्भातील पूर्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून आज दिवसभरात मुसळधार पाऊस झाल्याने आज दिनांक 13 जुलै रोजी रात्री 10.30 वाजेला हतनूर धरणाचे 41 दरवाजे 5 मीटरने उघडण्यात आलेले आहे. यावर्षी हतनूर धरणाचे 41 दरवाजे पहिल्यांदाच उघडण्यात आलेले आहे.त्यातून तब्बल 141088 क्युसेक्स इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग तापीनदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी आता दुथळी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.तापी नदीकाठी कोणीही कोणत्याही कामासाठी जाऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे. तसेच आज धरणाची जलपातळी 209.520 मीटर पर्यंत पोहचलेली असून धरणात आज रोजी 180.40 दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा शिल्लक आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने या क्षेत्रातील भुसावळ, मुक्ताईनगर , बोदवड, यावल , रावेर , या तालुक्यातील 38 हजार हेक्टरवरील शेतीला याचा लाभ होणार असल्याची माहिती हतनूर धरणाचे उप अभियंता यांनी दिलेली आहे.