आरोग्यमहाराष्ट्रमुंबई

सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पूर परिस्थितीवर लक्ष ठेवावे,मदतीसाठी तात्काळ कळवावे-ना.अनिल पाटील मदत व पुनर्वसन मंत्री

मुंबई, दि १९ :- भारतीय हवामान विभागाने २१ जुलैपर्यंत काही जिल्ह्यांना दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व जिल्हाधिकारी यांनी पूर परिस्थीतीवर लक्ष ठेवावे तसेच कोणतीही मदत लागल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि आपल्याशी तत्काळ संपर्क साधावा, अशा सूचना मंत्री श्री. पाटील यांनी दिल्यात.

            रत्नागिरी, रायगड, गडचिरोली, ठाणे, मुंबई शहर, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्हाधिकाऱ्यांशी मंत्री श्री. पाटील यांनी संवाद साधला.

            रत्नागिरी, रायगड, गडचिरोली या जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती आहे. परंतू एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ची बचाव पथके कार्यरत असून जीवीत हानी झालेली नाही. सद्यस्थितीत  रत्नागिरी – ८७, रायगड ९९१, ठाणे जिल्ह्यात ४५८ लोकांना तर पालघर जिल्ह्यात ८७ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती  संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिली. 

            गडचिरोली जिल्ह्यात चार रस्ते बंद असल्यामुळे १६८८ गावांपैकी १०० गावांचा   संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील राजोली गावातील  १८  लोकांना काल निवारा केंद्रात हलवण्यात आले होते मात्र आता पूर परिस्थिती सामान्य झाल्याने त्यांना मूळ गावी परत पाठविण्यात आले आहे.

             रायगड जिल्ह्यात ६ नद्यांपैकी कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा या ३ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली  आहे. एनडीआरएफची चमू चिपळूणला तैनात करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जगबूडी व  वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली असुन  चिपळूण मधील ६५ तसेच खेड मधील २२ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती संबंधित जिल्हाधिकारी यांनी व्हिसीद्वारे दिली.

            जिल्हा व राज्यस्तरावर २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असुन मदत व बचावकार्य सुरळीत आहे, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक आप्पासो धुळाज यांनी सांगितले.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button