
वरणगाव (ता. भुसावळ): राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ (टप्पा क्र. १) अंतर्गत भुसावळ तालुक्यातील वरणगाव महसूल मंडळाचे (टहाकळी) भव्य शिबिर शनिवारी, ७ मार्च २०२६ रोजी उत्साहात पार पडले. या शिबिरात महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना प्रत्यक्ष जागेवरच उपलब्ध करून देण्यात आला.
महत्त्वाच्या मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुसावळच्या तहसीलदार नीता लबडे या होत्या. यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार संतोष विनंते, पूजा अवघडे, शोभा घुले, हेमंत गुरव, जितेंद्र पाडवी, रोशना रेवतकर यांच्यासह कृषी विभाग, भूमी अभिलेख आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पाणंद रस्ते मोहिमेबाबत महत्त्वाची घोषणा
याप्रवेळी मार्गदर्शन करताना ना. संजय सावकारे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, शेतीच्या विकासासाठी पानंद रस्ते मोकळे असणे अत्यंत आवश्यक आहे, तरी यात कोणीही अडथळा आणू नये. ‘बळीराजा पानंद रस्ते मोहिमे’ अंतर्गत सर्व पानंद रस्त्यांचे खडीकरण करून रस्ते चकाचक करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
शासकीय योजनांचे मार्गदर्शन व लाभ वाटप
कायदेशीर मार्गदर्शन: नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी अकृषिक (NA) कायद्यातील बदलांबाबत सविस्तर माहिती दिली.
सामाजिक न्याय: संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेची माहिती देऊन दिव्यांग बांधवांनी UDID कार्ड काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले.
जागेवरच सेवा: सेतू सुविधा केंद्र चालकांनी आधार किटच्या माध्यमातून आधार अपडेट करणे, उत्पन्न व इतर दाखल्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम प्रत्यक्ष शिबिरात केले.
शिबिरातील लाभाचा तपशील
शिबिरात ७८० हून अधिक लाभार्थी सहभागी झाले होते. मुख्य वाटप खालीलप्रमाणे:
◾विशेष सहाय्य योजना: ५२ लाभार्थी
◾माझा ७/१२ अचूक ७/१२ : १३९ ७/१२ वाटप
◾तुकडा शेरा कमी करणे: ९७ प्रकरणे
◾ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र: ४० लाभार्थी
◾शालेय दाखले व प्रमाणपत्रे: ५५ विद्यार्थी/नागरिक
◾फेरफार निर्गती व सातबारा दुरुस्ती: २१६ प्रकरणे
◾लक्ष्मी मुक्ती व इतर लाभ: २५ लाभार्थी
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती लुटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंगेश पारिसे यांनी केले. या शिबिरामुळे नागरिकांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांचे जागेवरच निराकरण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.









