किती मार्क्स मिळाले यापेक्षा किती ज्ञान प्राप्त केले हे महत्त्वाचे – एस. एस. अहिरे

भुसावळ- प्रत्येक पालकाला आपला मुलगा प्रत्येक परीक्षेत प्रथम यावा असे वाटते. मात्र या स्पर्धेत पालक नकळत विद्यार्थ्यांच्या बालवयातील सुप्त गुणांना आळा घालतात. दैनंदिन जीवनात केवळ मिळालेले मार्क्स महत्त्वाचे नसून, विद्यार्थ्याने किती ज्ञान आत्मसात केले आणि त्या ज्ञानाचा उपयोग तो किती प्रभावीपणे करू शकतो, हे अधिक महत्त्वाचे आहे. मार्क्स विद्यार्थ्याला पुढील आयुष्यात निर्णयक्षम बनवत नाहीत. त्यामुळे पालकांनी गुणांपेक्षा ज्ञानावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन तळवेल (ता. भुसावळ) येथील नेहरू विद्या मंदिरचे मुख्याध्यापक एस. एस. अहिरे यांनी केले.
भुसावळ शहरातील कलाम सायंटिस्ट सेंटरच्या चार विद्यार्थ्यांची गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय गणित महोत्सवासाठी निवड झाली होती. या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल आयोजित गुणगौरव समारंभात अहिरे बोलत होते.
या कार्यक्रमास सु.रा. आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. आर. धनगर, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक अविनाश मोरे, देवगिरी इन्स्टिट्यूटच्या संचालक ॲड. जयश्री राय, एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट्सचे चेअरमन सुनील वानखेडे, झिकरा इंग्लिश मिडियम स्कूल, जामनेर येथील विज्ञान शिक्षक नदीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मॅथ मॉडेल स्पर्धेच्या ज्युनिअर गटात वेदांत बऱ्हाटे व मोहित फिरके यांनी तृतीय क्रमांक, तर सीनियर गटात पार्थ चौधरी व टीशा पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. याचवेळी झिकरा इंग्लिश मिडियम स्कूलचे विज्ञान शिक्षक नदीम शेख यांचे गणित विषयातील कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय अॅप्रिसिएशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिपिन चौधरी यांनी केले, तर आभार विकास बऱ्हाटे यांनी मानले.












