क्राईम/कोर्टमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रीय

‘मृत्युपत्र’ स्थावर मालमत्तेमध्ये अधिकार प्रदान करणारे दस्तऐवज मानले जाऊ शकत नाहीत – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली दि-24/02/2025 : सर्वोच्च न्यायालयाने मालमत्तेच्या मालकी हक्कांबाबत काल एक महत्त्वाचा आणि दूरगामी परिणामकारक निर्णय दिला आहे. हा निर्णय मृत्युपत्र आणि पॉवर ऑफ अटर्नी सारख्या मालमत्तेच्या व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांच्या वैधतेवर आहे. या कागदपत्रांच्या आधारे स्थावर मालमत्तेचे मालकी हक्क मिळू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मृत्यू पूर्व केलेल्या मृत्युपत्राच्या वैधतेचा मुद्दा आता चर्चेत आलेला आहे.
मृत्युपत्र म्हणजे काय
मृत्युपत्र एक कायदेशीर दस्तऐवज आहे, जे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर त्याची मालमत्ता कशी आणि कोणामध्ये वाटायची आहे हे सांगते. मृत्युपत्राद्वारे मालमत्तेचा मालक आपल्या संपत्तीचे हक्क एका व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना देऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर मालमत्ता फक्त निवडक लोकांनाच मिळावी असे वाटत असेल तर, त्यासाठी मृत्युपत्र आवश्यक आहे. मृत्युपत्राशिवाय मृत्यू झाल्यास मालमत्तेचे विभाजन उत्तराधिकार कायद्यानुसार केले जाईल. पण, मालमत्तेच्या मालकी हक्कांशी संबंधित सर्वोच्च न्यायाने दिलेला अलीकडचा निकालही तुम्हाला माहिती असायला हवा.
मृत्युपत्र आणि पॉवर ऑफ अटर्नी वैध नाही…
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एका खटल्यात म्हटले आहे की, मालमत्ता हस्तांतरण किंवा मालकीसाठी मृत्युपत्र आणि पॉवर ऑफ अटर्नी वैध कागदपत्रे मानले जाऊ शकत नाहीत. घनश्याम विरुद्ध योगेंद्र राठी या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, मृत्युपत्र करणाऱ्याच्या मृत्यूपूर्वी मृत्युपत्राचा कोणताही प्रभाव पडत नाही. तसेच, पॉवर ऑफ अटर्नी धारकाने विक्री करार केला नाही तर तो दस्तऐवज आपोआप अवैध ठरतो.
पॉवर ऑफ अटर्नी आणि मृत्युपत्र: मालकीसाठी नाही
न्यायालयाने म्हटले आहे की पॉवर ऑफ अटर्नी आणि मृत्युपत्र स्थावर मालमत्तेमध्ये अधिकार प्रदान करणारे दस्तऐवज मानले जाऊ शकत नाहीत. जर दोन्ही दस्तऐवज कोणत्याही राज्य किंवा उच्च न्यायालयात मालकीचा पुरावा म्हणून मान्यताप्राप्त झाले तर, त्याला संवैधानिक कायद्याचे उल्लंघन मानले जाईल. मालमत्तेची मालकी किंवा हस्तांतरण केवळ नोंदणीकृत हस्तांतरण कराराद्वारेच होऊ शकते.
मृत्युपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका
त्याचवेळी, मृत्युपत्राशी संबंधित बाबींवर न्यायालयाने म्हटले की इच्छापत्र करणारा व्यक्ती मरेपर्यंत मृत्युपत्र प्रभावी होऊ शकत नाही. मृत्युपत्र करणारा जिवंत असताना मृत्युपत्र प्रभावी नसते आणि स्थावर मालमत्तेच्या मालकीचा दस्तऐवज म्हणून ओळखले जाऊ शकत नाही.
पॉवर ऑफ अटर्नीबद्दल न्यायालयाने काय म्हटले
याशिवाय संपत्तीच्या मालकी हक्कांसाठी पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करता येणार नाही, असेही न्यायालयाने उद्धृत केले. न्यायालयाने पुढे म्हटलेलं आहे की, पॉवर ऑफ अटर्नी केवळ एक प्रातिनिधिक दस्तऐवज आहे, जे धारकाला काही विशिष्ट कृती करण्याचे अधिकार देते. पॉवर ऑफ अटर्नीधारकाने मालमत्तेचे विक्रीपत्र किंवा इतर आवश्यक कागदपत्रे अंमलात आणली नाहीत, तर हे दस्तऐवज अप्रासंगिक ठरते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button