राज्यातील सर्व प्रकारच्या मॉल्सनी अग्निसुरक्षेचे निकष पूर्ण न केल्यास वीज,पाणी तोडण्यासह कायदेशीर कारवाई करणार- मंत्री उदय सामंत
सर्व प्रकारच्या मॉल्सची होणार तपासणी

मुंबई, दि.०३/०७/२५ : मुंबईतील लिंक स्क्वेअर मॉल (२९ एप्रिल २०२५) व ड्रीम मॉलमध्ये वारंवार लागणाऱ्या आगींच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने फायर ऑडिटसंदर्भात कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या मॉल्सनी ९० दिवसांत फायर ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित महापालिकांना आणि नगरपालिकांना दिले जातील. तसेच जे मॉल्स अग्निसुरक्षेचे निकष पूर्ण करणार नाहीत त्यांची वीज आणि पाणी जोडणी तोडण्यासह त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विधानपरिषदेत उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी आज दिली आहे.
आमदार कृपाल तुमाने यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री. उदय सामंत बोलत होते. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार अभिजित वंजारी, मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
मंत्री श्री.उदय उदय सामंत म्हणाले की, मुंबई महापालिकेने याबाबत आधीच कारवाई सुरू केली असून, ड्रीम मॉल सध्या बंद आहे. फायर सेफ्टीसंदर्भात यापुढे कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही आणि राज्यातील सर्व वर्ग ‘ब’, ‘क’, ‘ड’ महापालिकांनी आणि नगरपालिकांनी सर्व प्रकारच्या मॉल्सच्या अग्निसुरक्षा नियमांचे आणि निकषांचे काटेकोरपणे अनुपालन वेळोवेळी तपासावेत. आवश्यकता असल्यास महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण अधिनियम २००६ च्या तरतुदींनुसार कडक कारवाई केली जाईल, असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.













