Advertisement
क्राईम/कोर्टजळगाव

भुसावळमध्ये पूर्ववैमनस्यातून एकाचा खून, 3 आरोपी जेरबंद , यापूर्वीच्या एकाच खून प्रकरणातील एकाचा खून तर दुसऱ्या संशयितांचा आठवडाभरापूर्वी मृत्यू

वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांनी चिंतेचे वातावरण

भुसावळ दि-03/06/2026: भुसावळ शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाढत चाललेल्या गंभीर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कन्हाळा रोड वरील व्हिआयपी सिटी कॉलनी परिसरात घडलेली तरुणाच्या खुनाची घटना शहराला हादरवून सोडणारी ठरली आहे. पूर्ववैमनस्यातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय मंगेश अंबादास काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा अवघ्या २४ तासांत छडा लावत भुसावळ बाजारपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली असून, एक विधिसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेने आणखी एक धक्कादायक बाब समोर आणली आहे. मंगेश काळे हे यापूर्वीच्या एका गाजलेल्या खून प्रकरणातील संशयित होते आणि त्या प्रकरणातील दुसऱ्या संशयिताचाही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यामुळे एकाच खून प्रकरणातील दोन्ही संशयितांचा आठवडाभरात मृत्यू ही बाब शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे.
घराच्या छतावर झोपलेल्या तरुणावर मध्यरात्री हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील डीआरपी सिटी कॉलनी परिसरात राहणारे मंगेश अंबादास काळे हे २९ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास पत्नी पायल यांच्यासह घराच्या छतावर झोपलेले होते. याचवेळी जुने वैमनस्य उकरून काढत कुंदन उर्फ अनिल पठारे, रोहित उर्फ दादू नवगिरे, विशाल गंगाट, बाबा गंगाट, अंकित आणि भावेश ठेपे हे तेथे पोहोचले.
सुरुवातीला आरोपींनी शिवीगाळ करून वाद घातला. त्यानंतर अचानक त्यांच्याकडील चॉपर, हॉकी स्टिक, लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी मंगेश यांच्यावर बेछूट हल्ला सुरू केला. झोपेतून उठण्याचीही संधी न देता करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
जीव वाचविण्यासाठी छतावरून उडी; तरीही पाठलाग करून मारहाण
हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी मंगेश यांनी घराच्या छतावरून खाली उडी मारली. मात्र आरोपींनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. रस्त्यावर आल्यावरही त्यांना पकडून पुन्हा बेदम मारहाण करण्यात आली. चॉपरच्या वारामुळे डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली, तर लोखंडी रॉड आणि हॉकी स्टिकच्या मारामुळे डोक्यासह शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा झाल्या.
हल्ल्यादरम्यान मंगेश यांच्या पत्नी पायल यांनी आरडाओरड करून मदतीसाठी हाक मारली. यावेळी आरोपींनी त्यांनाही धमकावत, “कोणाला फोन केला किंवा पोलिसांना कळवले तर जीवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
नागरिक धावले; आरोपी पसार
पायल यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा होऊ लागले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेतील मंगेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
खुनाचा गुन्हा दाखल
मंगेश यांच्या मृत्यूनंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८८/२०२६ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध गंभीर कलमांसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.
तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि विविध ठिकाणी छापेमारी करून पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तीन आरोपींना जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कुंदन उर्फ अनिल पठारे (१९) आणि रोहित उर्फ दादू संजय नवगिरे (२२) यांचा समावेश आहे. एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला बाल निरीक्षण गृहात पाठविण्यात आले आहे.
एकाच खून प्रकरणातील दोन्ही संशयितांचा मृत्यू; शहरात चर्चांना उधाण
या प्रकरणामुळे आणखी एक जुने प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मंगेश काळे यांचे नाव सप्टेंबर २०२१ मध्ये हनुमान नगर परिसरात झालेल्या विजय उर्फ रणजित दिलीप चव्हाण खून प्रकरणात संशयित म्हणून समोर आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच दुसरे संशयित विजय उर्फ रणजित चव्हाण यांचा काही दिवसांपूर्वी ताप्ती नदी परिसरात मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर आता मंगेश काळे यांचाही खून झाल्याने एकाच खून प्रकरणातील दोन्ही प्रमुख संशयितांचा अवघ्या आठवडाभराच्या कालावधीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन मृत्यूंमध्ये कोणता संबंध आहे का, याबाबत शहरात विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. पोलिसांनी मात्र याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही.
वाढत्या चोरी, घरफोड्या आणि गुन्हेगारीमुळे नागरिक धास्तावले
भुसावळ शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. घरफोड्या, दुचाकी चोरी, बसस्थानकावर सोनसाखळी चोरी, शस्त्रांच्या धाकावर दरोड्याचे प्रयत्न, मारामाऱ्या आणि खुनाच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अनेक भागांत रात्रीच्या वेळी घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
विशेषतः शहरातील नव्याने विकसित होत असलेल्या वसाहती, कॉलनी परिसर आणि बाहेरील भागांमध्ये पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई, संशयितांची पडताळणी, सीसीटीव्ही यंत्रणा मजबूत करणे आणि रात्रीची गस्त वाढविणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
गुन्हेगारीवर नियंत्रणाचे आव्हान कायम
या प्रकरणात पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि अवघ्या २४ तासांत आरोपींना अटक करण्याची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय मानली जात आहे. मात्र खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचा वाढता आकडा, त्यामागील वैमनस्याची पार्श्वभूमी आणि शहरातील वाढती चोरी-घरफोडी यामुळे भुसावळसमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
सध्या अटक केलेल्या आरोपींकडून चौकशी सुरू असून या हल्ल्यामागील नेमका हेतू, जुन्या वादाचे स्वरूप, संभाव्य गुन्हेगारी संबंध आणि इतर व्यक्तींचा सहभाग याबाबत पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस हवालदार गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील विजय नेरकर, रमन सुरळकर, कांतीलाल केदारे, रविंद्र भावसार, सोपान पाटील, योगेश माळी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, जितेंद्र विटकर, जीवन कापडे, दिलीप कोळदे आणि चंद्रकांत रायपुरकर आदींनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Back to top button
Join WhatsApp