
भुसावळ : नगरपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांची मालिका दिवसेंदिवस तीव्र होत असून, या वादाला आज नव्याने धार आली. सत्ताधारी पक्षाने नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली अनिल चौधरी यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भाजपच्या आरोपांचे जोरदार खंडन करण्याचा प्रयत्न केला.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सचिन चौधरी, नगरसेवक उल्हास पगारे, सोहेल पठाण, अकिल पिंजारी, अमिन कुरेशी, आशा चौधरी, विशाल नारखेडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांनी आमदार तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भाजपचे गटनेते युवराज लोणारी आणि नगरसेवक निक्की बत्रा यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण आणखी तापवले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत खळबळजनक दावा केला आहे की, भाजपचे गटनेते नगरसेवक युवराज लोणारी यांनी माजी आमदार तथा नगरसेवक संतोष चौधरी यांची भेट घेऊन सुमारे 30 लाख रुपयांचे बिल काढल्याचा प्रकार घडला आहे.
याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष विशाल नारखेडे यांनी नगरसेवक निक्की बत्रा यांच्यावर टीका करत “भुसावळ शहरातील खरात बाबा” अशी उपमा दिली. या वक्तव्यामुळे राजकीय वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सत्ताधाऱ्यांनी नगरपरिषदेच्या सभेतील काही व्हिडिओ क्लिप्स सादर करत नगरसेवक संतोष चौधरी यांनी सभागृहात केलेले आवाहन दाखवून भाजपने केलेले आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही बाजूंमधील आरोप-प्रत्यारोप आता पुराव्यांच्या आधारे लढवले जात असल्याचे चित्र दिसून आले.
नगरसेवक उल्हास पगारे यांनी मंत्री संजय सावकारे यांच्यावर निशाणा साधत, त्यांच्या दबावामुळे अधिकारी सुट्टीवर जात असून विकासकामे ठप्प होत असल्याचा आरोप केला. तसेच युवराज लोणारी यांच्यावर पूर्वी गंभीर गुन्ह्यांमध्ये तडीपार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी भाजप नगरसेवकांवर विकासकामांना विनाकारण विरोध केल्याचा आरोप करत, सभागृहातील गोंधळाबाबत कठोर भूमिका घेतली. यापूर्वीच्या दोन सभांमध्ये झालेल्या गोंधळामुळे सभा तहकूब कराव्या लागल्या होत्या. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
एकूणच, भुसावळ नगरपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होत असून, आगामी काळात हे राजकारण आणखी तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.












