भुसावळात गौमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्याची मागणी; तहसीलदारांना विविध सामाजिक संघटनांचे निवेदन
अभिलाष नागला यांनी मांडली भूमिका

भुसावळ, २७ एप्रिल २०२६ — गौमातेला अधिकृतपणे ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्यात यावे, देशभरात गोहत्येवर पूर्ण बंदी घालण्यात यावी आणि गोसंरक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी भुसावळ येथील विविध सामाजिक, धार्मिक आणि गौभक्त संघटनांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनाद्वारे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जनभावना पोहोचविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय संस्कृतीत गौमातेचे स्थान अत्यंत पवित्र असून ती केवळ एक पशू नसून भारतीय परंपरा, श्रद्धा आणि कृषीव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. गौमाता ही समस्त ऐश्वर्याची प्रदाता असून कृषी आणि आरोग्य व्यवस्थेचा आधार मानली जाते. मात्र, आजही देशातील अनेक भागांमध्ये गोवंशाची दयनीय अवस्था असून गोहत्या सुरू असल्याचे नमूद करत याबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या अशा
निवेदनात तीन महत्त्वाच्या मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत.
पहिली मागणी म्हणजे गौमातेला संवैधानिक दर्जासह अधिकृतपणे ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्यात यावे. यामुळे भारतीय संस्कृतीतील तिच्या स्थानाला शासकीय मान्यता मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
दुसरी मागणी देशभरात गोहत्येवर संपूर्ण बंदी घालण्याची आहे. यासाठी कठोर कायदे लागू करून गोवंश संरक्षणाला कायदेशीर बळ द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तिसरी मागणी म्हणजे निराश्रित गोवंशासाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये योग्य सुविधा असलेल्या गोशाळा उभाराव्यात आणि त्यांना शासनाकडून नियमित अनुदान उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांची समस्या कमी होईल आणि गोसंरक्षण अधिक प्रभावी होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
हजारो स्वाक्षऱ्यांसह निवेदन
हे निवेदन नंदग्राम गौधाम, अंजाळे, श्री राधाकृष्ण प्रभातफेरी, भुसावळ, अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण संघटना, माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, अखिल भारतीय जैन संघटना, प्रतिष्ठा महिला मंडळ तसेच इतर समस्त गौभक्त संघटनांच्या वतीने देण्यात आले आहे. निवेदनासोबत हजारो नागरिकांच्या स्वाक्षरीयुक्त प्रतीही जोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा
गौभक्त संघटनांनी तहसील प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन शासनापर्यंत हा संदेश पोहोचवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. जनभावनांचा आदर राखत गौमातेच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी तातडीने आवश्यक निर्णय घेतले जावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
यावेळी प्रतिष्ठान महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, नंदग्राम गोधाम अंजाळेचे संचालक तथा गोसेवक अभिलाष नागला यांच्यासह भुसावळ शहरातील गोप्रेमी आणि गोसेवक उपस्थित होते.













