Advertisement
आरोग्यजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

आपत्ती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज; आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित – आपत्ती व्यवस्थापन मंत्री, श्री. गिरीश महाजन


मुंबई, दि-२३/०६/२५: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी नद्या, नाले  भरून वाहत आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यांतील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित करण्यात आले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल नुकताच कोसळल्याची दुर्घटना घडली. त्यामुळे नागरिकांनी  पर्यटन स्थळे  व धोकादायक ठिकाणी अधिक सतर्क राहावे, असे  आवाहन आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी केले आहे.  तसेच अतिवृष्टी, वीज पडणे, दरडी कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवर  तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीने मदत मिळावी यासाठी  1070, 09321587143 , 022-22027990022-22794229 हे राज्य  हेल्पलाइन क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. तसेच 1077 हा  हेल्पलाइन क्रमांक २४ तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत
पर्यटनाचा आनंद घेताना विशेष काळजी घ्या
पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी, वीज पडणे, दरडी कोसळणे यासारख्या आपत्ती परिस्थिती निर्माण होऊ शकतात.  त्यामुळे  पर्यटन स्थळी पर्यटकांनी विशेष खबरदारी व काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करून आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन म्हणाले, संभाव्य आपत्ती पासून संरक्षण होण्यासाठी शासन व प्रशासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे  नागरिकांनी पालन करावे.
वारी आरोग्यदायी व आनंददायी
पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक, आध्यात्मिक व सामाजिक परंपरा आहे‌. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पदयात्रा करतात, ही वारी सुरक्षित आरोग्यदायी व आनंददायी व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांबरोबरच आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत देखील उपायोजना राबविण्यात येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने मदत मिळावी म्हणून वरील हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आपत्कालीन मदत केंद्र देखील प्रत्येक टप्प्यावर कार्यान्वित करण्यात येत आहेत. अतिवृष्टीमुळे वीज पडणे, दरडी कोसळणे यासारख्या आपत्ती निर्माण होऊ शकतात, यासाठी वारकऱ्यांनीही योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी केले आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button