शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत भुसावळ तालुक्यात तहसीलदारांनी घरोघरी जाऊन, शासकीय योजनांची केली जनजागृती
शासकीय योजनांची जनजागृती करण्यासाठी महसूल प्रशासनाची गावोगावी जनजागृती

भुसावळ, दि. 21 सप्टेंबर 2025: महाराष्ट्र शासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यभरात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात शेत पाणंद रस्त्यांचे सीमांकन आणि मोजणी करणे तसेच अतिक्रमण हटवणे यासारख्या महत्त्वपूर्ण उपाययोजना राबवल्या जात आहेत. भुसावळ तालुक्यात या मोहिमेअंतर्गत जवळपास 90 पाणंद रस्त्यांचे सीमांकन आणि मोजणी करण्याचे नियोजन आहे. याची सुरुवात साकेगाव आणि खडके या गावांपासून झाली असून, साकेगाव येथील अंदाजे 1.5 ते 2 किमी लांबीचा रस्ता आणि खडके येथील 1.5 ते 2 किमी लांबीच्या दोन पाणंद रस्त्यांचे सीमांकन आणि मोजणी पूर्ण झाली आहे. या कामामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी सोयीस्कर मार्ग उपलब्ध होणार असून, शेतकरी वर्गातून तालुका प्रशासनाच्या या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

महादेव माळ तांड्याला भेट आणि शिवार फेरी
या मोहिमेचा भाग म्हणून भुसावळच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार निता लबडे यांनी नुकतीच महादेव माळ या तांड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवार फेरी घेऊन परिसराची पाहणी केली आणि स्थानिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महादेव माळला महसूली गावाचा दर्जा मिळावा यासाठी प्रशासन सक्रियपणे कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच, भिल्ल आणि बंजारा समाजातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रमाणपत्रांचे वाटप आणि योजनांचे अर्ज भरण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे.
भिल्ल वस्तीला भेट आणि महिलांसाठी विशेष उपक्रम
महसूल प्रशासनाने भुसावळ येथील भिल्ल वस्तीला भेट देऊन तेथील निराधार आणि विधवा महिलांशी संपर्क साधला. यावेळी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना यांसारख्या योजनांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया घरोघरी जाऊन राबवण्यात आली. या महिलांना इतर शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली, ज्यामुळे त्यांना आर्थिक आणि सामाजिक आधार मिळण्यास मदत होणार आहे.
प्रशासनाची सक्रिय सहभागिता
या उपक्रमादरम्यान तहसीलदार निता लबडे आणि नायब तहसीलदार प्रीती लुटे यांच्यासह ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेमुळे शेतकऱ्यांसह समाजातील विविध वंचित घटकांना लाभ मिळत असून, प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून भुसावळ तालुका प्रशासन शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. येत्या काळात आणखी रस्त्यांचे सीमांकन आणि मोजणी पूर्ण करून तालुक्याच्या विकासाला गती देण्याचा प्रशासनाचा मानस आहे.असे तहसीलदार निता लबडे यांनी सांगितले आहे.












