भुसावळात सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सचिव संतोष थामेद यांचे आमरण उपोषण सुरू
सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू

भुसावळ, दि-१०/०६/२५ , भुसावळ शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नगरपरिषदेत सफाई कामगारांची संख्या अत्यल्प असल्याने हल्ली अस्तित्वात असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांकडूनच संपूर्ण शहरातील स्वच्छतेबाबतचा भार उचलला जात आहे. तसेच सफाई कामगार हे शहरातील सर्वात महत्वाचा घटक असूनही त्यांच्या विविध प्रकारच्या प्रलंबित मागण्या तसेच न्याय व हक्कांसाठी अभ्यासपूर्ण लक्ष देऊन संवैधानिक मार्गाने लढा देण्यासाठी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव संतोष थामेत यांनी वेळोवेळी नगरपरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय ते मंत्रालयातील प्रशासनाकडे अविरत पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. तरीही भुसावळ नगरपरिषद प्रशासनाकडून सफाई कामगारांच्या विविध मागण्या या दिर्घकाळ प्रलंबित असल्याने भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांची दिनांक 9 जून रोजी त्यांच्या दालनात संतोष थामेत यांनी भेट घेतल्यानंतर निवेदन देऊन सदरील मागण्या लवकर मान्य करून उचित कार्यवाही करण्याची मागणी केलेली होती. मात्र मुख्याधिकारी यांनी काही मागण्या या अंशतः मान्य करण्याचे आश्वासन दिले असून काही उर्वरित मागण्यांबाबत ठोस कार्यवाहीचा निर्णय घेतलेला नाही.
बेमुदत आमरण उपोषण सुरू
यासंदर्भात आज मुख्याधिकारी यांनी प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून दोन दिवसात मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन दिवसानंतरही सफाई कर्मचाऱ्यांच्याबाबत उचित कार्यवाही न झाल्याने अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमारजी वाल्मिकी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश अध्यक्ष धरराजजी चावरीया यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या माध्यमातून आज दिनांक १० जून पासून नगरपरिषदेसमोर संतोष थामेत यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

तसेच त्यांच्या उपोषणा दरम्यान त्यांना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचे काही बरेवाईट झाल्यास त्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे.उपोषणस्थळी जिल्हाध्यक्ष राकेश बारसे
, जिल्हा उपाध्यक्ष विजय तेजकर, जिल्हा सचिव- नरेश बिऱ्हाडे, भडगाव तालुका अध्यक्ष संजय वारसे, तालुकाध्यक्ष मुक्ताईनगर – साजन फतरोड , भुसावळ शहराध्यक्ष मयूर सुरवाडे, जळगाव शहर प्रमुख – बब्बू जावळे उपस्थित आहेत. खालील नमूद मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

भुसावळ नगरपालिकेतील सेवानिवृत्ती व स्वेच्छा निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या उपदानाची रक्कम व पेन्शन विक्रीची रक्कम तात्काळ मिळणे, तसेच त्यांच्या हक्काचा निधी इतर विभागांसाठी नियमबाह्यपणे वर्ग करून वापरल्यामुळे त्यांच्या हक्काच्या रकमेपासून त्यांना जाणीवपूर्वक दिर्घकाळ वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे,
सुधारित शासन निर्णयानुसार मुद्दा क्रमांक ८.१० सफाई कर्मचाऱ्यांची राहती घर नावावर करून मिळणे,
भुसावळ नगरपरिषदेची स्थापना पासून सध्याच्या स्थितीत जी कर्मचारी संख्या एकूण (३०२ कर्मचारी ) होती ती आज तेवढीच आहे. वाढत्या क्षेत्रफळ व लोकसंख्या वाढल्यामुळे कर्मचारी पद भरतीचा आकृतीबंधानुसार नगरपरिषद संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करून सफाई कर्मचाऱ्यांची ९५० पदे भरती करावी,
भुसावळ नगरपरिषद आस्थापना विभाग प्रमुख- वैभव एस पवार याला बेकायदेशीर नियुक्ती देऊन सफाई कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्यामुळे त्याला त्याची चौकशी करून निलंबित करणे,
भुसावळ नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना सेफ्टीकीट, गणवेश व गम बूट व त्यांना लागणारे इतर साहित्य मिळणेबाबत.
भुसावळ नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना आपल्या कामाची व्यतिरिक्त त्यांना दुसरं काम दिलं जात असेल तर त्यांना २७ सप्टेंबर २०१६ च्या शासन परिपत्रकानुसार एक व्यक्त केलेल्या कामाचा लाभ मिळणे,
संघटनेने वारंवार पत्रव्यवहार करूनही संघटनेच्या कोणत्याही पत्राचे उत्तर दिलं जात नाही व त्यांना प्रतिसाद देत नाही व संघटनेच्या पत्रव्यवहाराला जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं.तरी संघटनेच्या मागण्यांना व तक्रारीला प्रतिसाद मिळणे,
सफाई कर्मचाऱ्यांच्या संदर्भात भुसावळ नगरपरिषदेच्या मिटिंगमध्ये जे काही निर्णय घेत असतील तर संघटनेला त्यात सहभाग करून घेणे आवश्यक आहे. कारण की अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे ५०% टक्के हून अधिक सफाई कर्मचारी सदस्य आहेत. तसेच संघटनेला मान्यता मिळणेबाबत.













